सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ८

Previoust Article Next Article
हिंदी English ગુજરાતી বাংলা ಕನ್ನಡ தமிழ் മലയാളം
संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३९४ व १३९५.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १३९४ या अग्रलेखामध्ये लिहितात,
ब्रह्मवादिनी लोपामुद्रा सातवी नवदुर्गा कालरात्रिच्या चरणांवर मस्तक ठेवून व तिला विनम्रपणे अभिवादन करून बोलू लागली, “आप्तजनहो! ही सातवी नवदुर्गा कालरात्रि शांभवी विद्येच्या तेराव्या व चौदाव्या पायऱ्यांची (कक्षांची) अधिष्ठात्री आहे व अश्विन शुद्ध सप्तमीच्या दिवस व रात्रीची नायिका आहे.
ही भगवती कालरात्रि भक्तांच्या शत्रूंचा पूर्णपणे विनाश करणारी आहे. हिच्या पूजनामुळे भूत, प्रेत, राक्षस, दैत्य, दानव, तमाचारी मांत्रिक व पापी शत्रू असे सर्वच्यासर्व एक वर्षपर्यंत त्या पूजकभक्ताच्या आसपासही फिरकू शकत नाहीत.”
सर्व शिवगण गोंधळून जाऊन एकमेकांकडे पाहू लागले, “आम्ही तर पिशाचमयच आहोत. पण आम्हाला हिचे भय वाटण्याऐवजी हिच्याविषयी अत्यंत प्रेमच वाटत आहे.”
लोपामुद्रेने स्मितहास्य करून म्हटले, “ही आहेच तशी व तुम्हीही ‘शिवगण' आहात, केवळ पिशाचे नाहीत व आता तर तुमचे रूपदेखील पालटलेले आहे.”
सर्व ऋषिसमुदाय उभा राहून लोपामुद्रेकडे विनंती करू लागला, “आम्हाला राना-वनातून जंगलांतून, निबिड अरण्यांतून, अनेक स्मशानघाटांवरून, प्रचंड नरसंहार झालेल्या प्राचीन युद्धभूमींवरून एकाकी प्रवास करावा लागतो व हिचे गुणवर्णन ऐकून आम्हाला ह्या नवदुर्गा कालरात्रिच्या चरणांवर मस्तक ठेवण्याची इच्छा होत आहे. आम्हाला तशी अनुज्ञा मिळेल काय?”
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने प्रश्नार्थक नजरेने भगवान त्रिविक्रमाकडे पाहिले व त्याबरोबर आपल्या मातेची अनुज्ञा घेऊन भगवान त्रिविक्रम परत एकदा त्याच्या एकमुखी रूपात ह्या सर्वांमध्ये आला आणि त्याने ब्रह्मवादिनी अरुंधतीस लोपामुद्रेचे हात हातात घेऊन सर्वांना दाखविण्यास सांगितले व लोपामुद्रेच्या मस्तकावरील वस्त्र दूर करून तिच्या कपाळाचा भाग दाखविण्यास सांगितला.
अरुंधतीने तसे करताच सर्व महर्षि, ऋषिवर व ऋषिकुमार अत्यंत आश्चर्यचकित व थोडेसे भयभीतही झाले.
कारण ब्रह्मवादिनी लोपामुद्रेच्या मस्तकाला व हातांना जिथे जिथे भगवती कालरात्रिच्या चरणांचा स्पर्श झाला होता, तेथून अनेक विद्युत्-शलाका लोपामुद्रेच्या सहस्रारचक्रामध्ये घुसून खेळ खेळत होत्या व तिच्या हातांमधून अग्निज्वाळांचे लोळच्या लोळ तिच्या शरीरातील सर्वच्या सर्व ७२,००० नाड्यांमध्ये शिरून आनंदनृत्य करीत होते.
हे पाहताच महर्षिसुद्धा भयभीत झाले व ते पाहून भगवान त्रिविक्रमाने सांगितले, “ही कालरात्रि आहेच तशी. ह्या ज्वाळा व विद्युत्-शलाका ब्रह्मवादिनी लोपामुद्रेला कुठल्याही प्रकारे वेदना किंवा पीडा नाही देत आहेत, तर उलट ह्या विद्युल्लता व ज्वाळांमुळे ब्रह्मवादिनी लोपामुद्रेच्या सहस्रारातील सर्व सिद्धी जागृत होत आहेत व तिच्या देहातील सर्वच्या सर्व अर्थात १०८ शक्तिकेंद्रे जणू पवित्र यज्ञकुंडच बनली आहेत
व हे असे तेज धारण करणे सामान्य मानवालाच काय; परंतु महर्षिंनाही शक्य नाही.
आठवी नवदुर्गा महागौरी हिचे रूप कितीही शांत व प्रसन्न असले, तरीही तिच्या चरणांच्या प्रत्यक्ष स्पर्शाने मानवी देहातील सर्वच्या सर्व १०८ शक्तिकेंद्रे अत्यंत शीतल व शांत होतात व ७२,००० नाड्यांमधून चांद्रतेज जलप्रवाहाप्रमाणे वाहू लागते व ती अतिशीतलतादेखील सामान्य श्रद्धावानाला व महर्षिंनासुद्धा सहन करता येत नाही.
नववी नवदुर्गा सिद्धिदात्री अत्यंत प्रसन्नवदना आहे. परंतु तिचे मणिद्वीपमातेशी एकरूपत्व आहे.
ह्या सर्व गोष्टींमुळे ह्या तिघींच्या प्रतिमांचे पूजन करणे अत्यंत सोपे असले, तरी त्यांच्या प्रत्यक्ष रूपांचे ध्यान करणे महर्षिंनाही जमत नाही.
परंतु ह्या तिघींच्या प्रत्यक्ष पूजनाचे व प्रत्यक्ष ध्यानाचे सर्वच्या सर्व लाभ अश्विन शुद्ध नवरात्रीतील पंचमीला माता ललिताम्बिकेचे पूजन केले असता सहजपणे प्राप्त होतात.
कारण पंचमीची नायिका स्कन्दमाता आहे व ललिताम्बिका सर्व श्रद्धावानांची प्रत्यक्ष पितामहीच आहे.
ही आदिमाता ‘ललिताम्बिका' स्वरूपात नेहमी ‘ललितापंचमी' ह्या दिवशीच प्रकट होत असते व तेव्हा कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री तिच्या प्रमुख सेनापती असतात.
ललितापंचमीच्या पूजनाचे वर्णन करण्यास मलासुद्धा अनेक दिवस लागतील.”
एवढे बोलून भगवान त्रिविक्रमाने कालरात्रिस व आदिमातेस प्रणाम केला

व त्यासरशी सर्वच्या सर्व नऊ नवदुर्गा, दशमहाविद्या, सप्तमातृका, ६४ कोटी चामुण्डा तेथे उपस्थित झाल्या
व मग त्या सर्वजणी क्रमाक्रमाने आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या रोमारोमात शिरल्या
व त्याबरोबर मणिद्वीपनिवासिनी आदिमातेच्या तिसऱ्या डोळ्यातून एकाचवेळी प्रखर व सौम्य असणारे असे अपूर्व तेज सर्वत्र पसरू लागले
आणि त्याबरोबर आदिमातेच्या मूळ रूपाच्या जागी तिचे ‘ललिताम्बिका' स्वरूप दिसू लागले.
ललिताम्बिकेने प्रकट होताच सर्वांना अभयवचन दिले, “ज्याला नवरात्रीतील इतर दिवशी नवरात्रिपूजन जमते आणि ज्याला नवरात्रीतील इतर दिवशी नवरात्रिपूजन जमत नाही, अशा सर्वांसाठीच ललितापंचमीच्या दिवशी माझ्या ‘महिषासुरमर्दिनी' स्वरूपाचे माझ्या लाडक्या पुत्रासह केलेले पूजन संपूर्ण नवरात्रीचे फल ज्याच्या त्याच्या भावानुसार देऊ शकते
व कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री ह्या तिघींच्या चरणांवर मस्तक ठेवण्यापासून मिळणारे लाभ, अत्यंत सौम्य रूपात ललितापंचमीच्या दिवशी केवळ मला व त्रिविक्रमाला बिल्वदळे अर्पण केल्याने प्राप्त होतात.
कारण तुम्ही आताच पाहिलेत की सर्व नवदुर्गा, सर्व सप्तमातृका, माझे सर्व अवतार व ६४ कोटी चामुण्डा माझ्यातच निवास करतात.”

बापू पुढे तुलसीपत्र - १३९५ या अग्रलेखामध्ये लिहितात,
सर्व ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनींनी अत्यंत प्रेमाने व आदराने ललिताम्बिकेचे ‘ललिताष्टक स्तोत्र' सामवेदीय पद्धतीने म्हणण्यास सुरुवात केली व त्याबरोबर ‘ललिताम्बिका' स्वरूप ‘मणिद्वीपनिवासिनी' रूपात परत विलीन झाले
व त्याबरोबर ती मणिद्वीपनिवासिनी आदिमातासुद्धा अदृश्य होऊन ‘अष्टादशभुजा अनसूया' व ‘श्रीविद्या' ह्या दोन रूपांतच पहिल्याप्रमाणे दिसू लागली.
आता ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने पुढे होऊन ‘कालरात्रिं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरम्' हा मंत्र जपण्यास सुरुवात केली व त्याबरोबर सातवी नवदुर्गा कालरात्रि तिच्या नेहमीच्याच स्वरूपात; परंतु सौम्य तेजाने युक्त अशी साकार झाली.
लोपामुद्रेने तिला प्रणाम करून बोलण्यास सुरुवात केली, “हे आप्तजनहो! शांभवीविद्येच्या तेराव्या व चौदाव्या पायरीवर (कक्षेवर), स्वतःच्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या आड येणाऱ्या सर्व शत्रूंचा विनाश करणे प्रत्येक साधकासाठी अत्यंत आवश्यक असते. कारण असे न केल्यास पावित्र्यालाच विरोध असणारे असुर व आसुरी प्रवृत्तीचे मानव त्या साधकाचा पुढचा प्रवास बिकट करून टाकतात
आणि म्हणूनच सर्व षड्रिपुंना सोडलेल्या साधकाला, तपस्व्याला आता पराक्रमी व शूर अशा वीर व्यक्तीच्या रूपात कार्य करावे लागते
व त्यासाठीच ही सातवी नवदुर्गा कालरात्रि अत्यंत दक्ष असते.
कारण पार्वतीनेसुद्धा तिच्या जीवनरूपी तपश्चर्येमध्ये ‘स्कन्दमाता' व ‘कात्यायनी' ह्या दोन कक्षा पार केल्यानंतर, कधी परमशिवाच्या खांद्याला खांदा लावून व अनेक वेळा स्वतः एकटीने अक्षरशः सहस्रावधी असुरांशी युद्ध केले आहे व त्या प्रत्येक असुराला तिने निश्चितच ठार मारले आहे
व त्यावेळेस तिचे युद्धभूमीवर प्रकट होणारे स्वरूप म्हणजेच सातवी नवदुर्गा ‘कालरात्रि' - जी आपल्या अपत्यांच्या संरक्षणासाठी सदैव युद्धास तयार असते.
हे प्रिय आप्तजनहो! नीट बघा. हिच्या चांद्रतलवारीवरसुद्धा पात्याच्या प्रत्येक बाजूस एक एक डोळा आहे.
जेव्हा जेव्हा हिचा सच्चा श्रद्धावान भक्त आपल्या भक्तिसाधनेत प्रगती करीत असतो, तेव्हा तेव्हा त्याच्या प्रपंचावर किंवा अध्यात्मावर हल्ला करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकावर भगवती कालरात्रिचे डोळे रोखलेले असतात व नेमक्या वेळी ही कालरात्रि आपली चांद्रतलवार त्या दुष्ट व्यक्तीवर किंवा असुरावर फेकते - स्वतःच्या स्थानापासून जराही न हलता.
कारण हिच्या चांद्रतलवारीचे दोन्ही डोळे ह्या तलवारीला नीट मार्गदर्शन करतात व तो असुर कुठेही लपून बसला असेल, तरी त्याच्या भोवतालच्या सर्व संरक्षक भिंती व अडथळे ह्यांना छेदून ही चांद्रतलवार त्या श्रद्धावानाच्या शत्रूचा विनाश घडवून आणते.
आता हिच्या हातातील कंटकास्त्राकडे पहा. ह्याला सात कंटक (काटे) आहेत. ह्यांतील सहा कंटक सहाच्या सहा लोकांतून सूक्ष्मातिसूक्ष्म पावित्र्यशत्रूंचा अर्थात असुरांचा व दैत्यांचा प्रभाव नाहीसा करतात.
खरं तर आतापर्यंत कधीही सहाव्या कंटकाचा उपयोगच झालेला नाही. कारण सहाव्या लोकात असुर कधीच शिरू शकलेले नाहीत
व सातव्या लोकात तर आसुरी वृत्तींना प्रवेश मिळणेही शक्य नाही.
मग ह्या सातव्या कंटकाचे कार्य काय?
हा सातवा कंटक तेराव्या व चौदाव्या पायरीवरील (कक्षेवरील) शांभवी विद्येच्या साधकाला, जे काही त्याला त्याच्या अंतःकरणावर कोरावयाचे असेल - भाव, शब्द, ध्यान, चित्र, प्रसंग, अनुभव, स्तोत्र, मंत्र, नाम - ते ते सर्व कोरण्यासाठी भगवती कालरात्रिकडून मिळणारे सर्वोच्च लेखन-साधन आहे

धर्मासनावर विराजमान सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू
व हा सातवा कंटक जेव्हा श्रद्धावानाला प्राप्त होतो, तेव्हाच स्वतः भगवान त्रिविक्रम, साधकाला पाहिजे ते त्याने लिहून झाल्यानंतर, त्या साधकाला शांभवी विद्येचा मंत्र स्वतः प्रदान करतो
व येथे त्या श्रद्धावान साधकाला माता कालरात्रि महागौरीरूप धारण करून त्याला शांभवीछात्र म्हणून स्वीकारते.
हे गौतम व अहल्या, यावे. तुमचे स्वागत असो. तुम्ही येथपर्यंत सर्व शिकूनच आलेले आहात.”
सर्व ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनींनी इतर सर्व उपस्थितांसह उभे राहून गौतम-अहल्येचे प्रेमाने स्वागत केले
व लोपामुद्रा पुढे बोलू लागली, “कालरात्रिच्या उग्र आणि तरीही अत्यंत सात्त्विक प्रेमाने भरलेल्या रूपाकडून आठवी नवदुर्गा महागौरी हिच्याकडे जाणे म्हणजे अत्यंत उग्र व दाहक तेजापासून अत्यंत सौम्य, शीतल तेजापर्यंतचा प्रवास.
अर्थात विश्वाच्या दोन ध्रुवांचे ज्ञान.”
आता सातवी नवदुर्गा कालरात्रिच हळूहळू आठवी नवदुर्गा ‘महागौरी' बनू लागली.
गौतम व अहल्या भगवती कालरात्रिचे स्तवन करून तिचा अत्यंत प्रेमाने निरोप घेत होते.
परंतु भगवती कालरात्रिने मात्र तिचे अंगुष्ठमात्र स्वरूप ब्रह्मर्षि गौतमाच्या हृदयात स्थापन केले.