सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख - भाग १

श्रीगणरायाला, या बुद्धीदात्या विनायकाला अनंत चतुर्दशीला निरोप देताना मनात हलकीशी उदासी दाटते. पण काही दिवसातच आपल्या श्रद्धेला नवचैतन्य देणारा, भक्तीचा व उत्साहाचा नवा प्रवास सुरू होतो, तो म्हणजे आश्विन नवरात्र.
आश्विन नवरात्रीच्या शेवटी म्हणजेच दसर्यास श्रीरामांनी रावणाचा नाश केला, अशुभाचा नाश झाला, म्हणून या नवरात्रीस सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी 'अशुभनाशिनी नवरात्र' म्हटले आहे.
या नवरात्रीमध्ये आई जगदंबेच्या विविध रूपांचे पूजन-अर्चन केले जाते. त्याचप्रमाणे भारतातील अनेक भागांत या नऊ दिवसात भक्तमाता पार्वतीच्या नऊ रूपांचे म्हणजेच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या रूपांचे भक्तिभावाने पूजन-अर्चन केले जाते. पार्वतीमातेच्या ह्याच रूपांना आपण ’नवदुर्गा’ या नावाने ओळखतो.
दैनिक प्रत्यक्षच्या अग्रलेखांद्वारे अगदी सहज व सोप्या भाषेत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या सखोल अभ्यासातून व चिंतनातून या नवदुर्गांचे माहात्म्य विषद केले आहे; हे अग्रलेख केवळ माहिती देणारे नाहीत; तर ते भक्तीला अधिक अर्थपूर्ण करणारे आणि नवदुर्गांची खरीखुरी ओळख करून देणारे आहेत.
आजपासून याच अग्रलेखांवर आधारित ब्लॉगपोस्ट आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहे. आपण सर्वजण या भक्तीभावाच्या व श्रद्धेच्या प्रवासात सामील होवूया.
संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक प्रत्यक्षमधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३८० व १३८१.
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू तुलसीपत्र-१३८० या अग्रलेखामध्ये लिहीतात,
ब्रह्मवादिनी लोपामुद्रा ही मूलार्कगणेशाच्या सत्ययुगातील स्थापनेची कथा सांगून झाल्यावर माता पार्वतीकडे कौतुकाने बघू लागली.
त्या अन्नपूर्णा पार्वतीने लोपामुद्रेस सांगितले, “हे ब्रह्मवादिनी लोपामुद्रे! किती सुंदरपणे ही कथा तू सांगितलीस!
श्रीशांभवीविद्येच्या पहिल्या कक्षेविषयी समजावून सांगताना ही कथा सांगून तू श्रद्धावानांसाठी ही पहिली पायरी चढणे अगदी सोपे करून ठेवले आहेस.”
शिव-ऋषि तुंबरुंनी अत्यंत प्रेमाने भक्तमाता पार्वतीस विचारले, “हे माते! ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने तिची जबाबदारी पूर्ण केली. पण ह्या पहिल्या पायरीवरील अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण फक्त तूच करू शकतेस. कारण ‘दक्षकन्या सती` व ‘हिमवानकन्या पार्वती` ह्या तुझ्या दोन्ही जन्मांमध्ये तू ह्या शांभवीविद्येच्या प्रत्येक पायरीवरून अत्यंत उचित प्रवास करून तपश्चर्या केली आहेस आणि तीदेखील मानवी जन्माला येऊन सूक्ष्मातील परमशिवास प्राप्त करून घेण्यासाठीच;
आणि ह्या तुझ्या तपश्चर्येमुळेच तुझे व शिवाचे विवाहबंधन घडून आले आणि स्कंद व गणपती ह्यांची उत्पत्ती झाली.”
देवर्षि नारदांनी शिव-ऋषि तुंबरुंच्या बोलण्यास पूर्णपणे अनुमोदन दिले व म्हणाले, “हे भक्तमाते पार्वती! तू प्रत्यक्ष शिवाकडूनच ही शांभवीविद्या तुझ्या तपश्चर्येच्या अंती पुनः प्राप्त करून घेतलीस व त्यामुळे तू स्वतःच शांभवीविद्येची प्रथम दीक्षित, प्रथम उपासिका व प्रथम कृतिशीला आहेस.
परमशिवाने तुला शांभवीविद्येतील प्रत्येक बारीक खाणाखुणा सखोल विवेचन करून सांगितल्या आहेत, म्हणून मी तुला सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की ब्रह्मवादिनी लोपामुद्रा शांभवीविद्या समजावून सांगत असताना, तुला पाहिजे तेव्हा आमच्या सर्वांचे मनोगत जाणून तू स्वतःहून बोलण्यास सुरुवात करावीस.
हे पार्वती! तू आदिमातेची अशी विलक्षण कन्या आहेस की जिच्या प्रत्येक कृतीमध्ये ‘शांभवीविद्या` हाच एकमेव मार्ग असतो व ह्यामुळेच तुझीच ह्या शांभवीविद्येच्या तपश्चर्येतील नऊ रूपे नवदुर्गा म्हणून प्रसिद्ध आहेत. १) शैलपुत्री, २) ब्रह्मचारिणी, ३) चंद्रघण्टा, ४) कूष्मांडा, ५) स्कंदमाता, ६) कात्यायनी, ७) कालरात्री, ८) महागौरी, ९) सिद्धिदात्री.”
त्यानंतर सर्व ऋषिवृंदाकडे वळून देवर्षि नारद म्हणाले, “पार्वतीच्या ह्या नऊ रूपांचे पूजन नवरात्रींमध्ये क्रमाने एक एक दिवशी केले जाते.
कारण ज्याप्रमाणे ‘श्रीसूक्त` हे भक्तमाता लक्ष्मी व आदिमाता महालक्ष्मी ह्यांचे एकत्रित स्तोत्र आहे, त्याचप्रमाणे ‘नवरात्रिपूजन` हे भक्तमाता पार्वतीचे व आदिमाता दुर्गेचे एकत्रित पूजन आहे
आणि ह्या नवदुर्गांमधील ‘ब्रह्मचारिणी` हे स्वरूप म्हणजे तर श्रीशांभवीविद्येचे आचारप्रतीकच आहे.
हिच्या तपश्चर्येच्या अंती परमशिव हिला प्राप्त होताच, हिने आपल्या पतीकडे फक्त दोनच इच्छा प्रकट केल्या - १) तिचे शिवावरील प्रेम अखंड व अक्षय असावे व २) परमशिवाप्रमाणेच हिचे प्रत्येक कार्यसुद्धा आदिमातेच्या सेवेसाठीच असावे.

शिवाकडून हे वरदान मागताना ही पार्वती परमशिवाशी व त्याच्या ‘आदिमातेचे अपत्य असल्याच्या` भावाशी तन्मयतेने एवढी एकरूप झाली होती की ती संपूर्ण शिवमय झाली व त्यामुळेच जन्मतः सावळी असणारी ही पार्वती शुभ्रधवल वर्णाची ‘महागौरी` व वृषभ वाहन असणारी झाली
आणि आदिमातेने पार्वतीच्या ह्या प्रेमभावाचा तेवढ्याच प्रेमाने स्वीकार करून पार्वतीचे ‘सिद्धिदात्री` हे नवदुर्गांमधील नववे रूप अर्थात महादुर्गेच्या स्वतःच्या सिद्धेश्वरी रूपाचे सोपे स्वरूप हिला बहाल केले.
व त्याच वेळेस ती सिद्धिदात्री पार्वती हीच ‘शांभवीविद्येची मूर्ती` म्हणून जाहीर केले.”
देवर्षि नारदांचे हे भक्तवत्सल उद्गार ऐकून पार्वतीने आदिमातेच्या अनुज्ञेनुसार सिद्धिदात्री हे स्वरूप धारण केले व ती बोलू लागली. परंतु शिव-ऋषि तुंबरुंनी अत्यंत विनयाने व प्रेमाने तिला मध्येच थांबवून प्रथम सर्व श्रद्धावानांना ‘नवदुर्गा`स्वरूपांची ओळख करून दिली ः-
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू तुलसीपत्र-१३८१या अग्रलेखामध्ये लिहीतात,
पार्वतीच्या ‘नवदुर्गा` रूपांची ओळख करून घेत असताना कैलाशावरील प्रत्येक जण एवढा आनंदित व उत्साहित झाला होता की तेथे जणू आनंदसागरच पसरला होता.
आता परत एकदा ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने बोलण्यास सुरुवात केली, “हे सर्वश्रेष्ठ ऋषिवर श्रद्धावानहो! शांभवीविद्येची उपासना पहिल्या पायरीपासून अठराव्या पायरीपर्यंत निर्विघ्न व्हावी म्हणूनच मूलार्कगणेशाची उपासना सांगितली आहे.

कारण शांभवीविद्येची उपासना करताना कुठलीही चुकीची गोष्ट घडून अर्थात आहार, विहार, आचार, विचार ह्यांमध्ये चूक होऊन चालत नाही व श्रीमूलार्कगणेशाच्या मंत्रपठणामुळे हे दोष घडतच नाहीत किंवा थोडेफार घडले, तरी तत्काळ नाहीसे होतात.
श्रीमूलार्कगणेशमंत्र ः
ॐ गं गणपते श्रीमूलार्कगणपते वरवरद श्रीआधारगणेशाय नमः।
सर्वविघ्नान् नाशय सर्वसिद्धिं कुरु कुरु स्वाहा॥
शांभवीविद्येच्या पहिल्या पायरीवर आदिमातेस व त्रिविक्रमास शरण जाताना प्रथम मूलार्कगणेशाच्या ह्या मंत्राचे दररोज ५ वेळा तरी पठण करावे.”
तिला मध्येच थांबवीत ब्रह्मवादिनी कात्यायनीने (ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांची प्रथम पत्नी) अत्यंत विनयाने प्रश्न केला, “हे ज्येष्ठ भगिनी लोपामुद्रे! मूलार्कगणेशाच्या ह्या मंत्राचे पठण केवळ शांभवीविद्येच्या उपासकांनीच करावे काय? इतर श्रद्धावानांनी करू नये काय?”
सिद्धिदात्री पार्वतीने अत्यंत सुहास्य मुद्रेने ब्रह्मवादिनी कात्यायनीकडे पाहिले, “हे प्रिय कन्ये कात्यायनी! तुला तुझ्या पतीप्रमाणेच सदैव सामान्यजनांच्या कल्याणाची काळजी लागून राहिलेली असते. त्यामुळे मी तुझ्याकडून हा प्रश्न अपेक्षिलेलाच होता.
हे कात्यायनी! सांगते ऐक की हा मूलार्कगणेशाचा मंत्र कुणाही श्रद्धावानाने पठण करण्यास काहीच हरकत नाही. त्यासाठी शांभवीविद्येचा उपासक असण्याची अट मुळीसुद्धा नाही.
कारण तसे बघायचे झाले तर प्रत्येक श्रद्धावान चण्डिकाकुलाच्या समवेत जीवन जगत असताना शांभवीविद्येचा पहिल्या व दुसऱ्या पायरीवरील उपासक झालेलाच असतो
आणि एवढेच नव्हे, आदिमातेची निःसीम भक्ती करणाऱ्या श्रद्धावानाकडून ही आदिमाता ज्याच्या त्याच्या प्रगतीनुसार त्याच्या कुठल्या ना कुठल्या जन्मात त्याच्याकडून शांभवीविद्या-उपासना कुठल्या ना कुठल्या प्रकारे करून घेतेच.”
भक्तमाता पार्वतीच्या ह्या उत्तरामुळे सर्व ऋषिकुमार व शिवगणही अत्यंत प्रोत्साहित झाले व अधिक लक्ष देऊन पुढील भाग ऐकण्यासाठी अधिकच आतुर झाले.
लोपामुद्रा :- “श्रीशांभवीविद्येची दुसरी पायरी म्हणजे ‘आदिमाता चण्डिकेपासूनच सर्व विश्वाची उत्पत्ती झालेली आहे व म्हणूनच सर्व विश्व जेवढे तिला ठाऊक आहे तेवढे कुणालाच ज्ञात असू शकत नाही` ह्याची सतत जाणीव ठेवून प्रत्येक कार्य करीत राहणे.
साधे दैनंदिन जीवनकार्य करीत असतानासुद्धा, साधना करीत असतानाही, इतर विशेष कार्य करीत असतानाही व काही चुकीचे घडत असतानाही, ‘ही आदिमाता त्याच क्षणाला ते जाणत असते` हे लक्षात घ्यावे लागते.
समजा! साधकाच्या मनात काही भला-बुरा विचार आला, साधनेत काही चुकले किंवा हातून अगदी कुठलीही मोठी चूक घडली, तरीदेखील शांभवीविद्येच्या साधकांना काळजी करण्याचे कारण नसते आणि घाबरण्याचे तर नाहीच नाही.
त्या श्रद्धावान साधकाने फक्त अत्यंत मोकळेपणाने आपल्या मनातल्या मनात आदिमातेस व त्रिविक्रमास, स्वतःला जे वाटते ते सांगावे व ५ वेळा ‘अंबज्ञ` असे म्हणावे.”
येथे न राहवून एक ऋषिकुमार अत्यंत आश्चर्याने व प्रेमाने उद्गारला, “काय! हे सर्व इतके सोपे आहे!”
लोपामुद्रेने अत्यंत वात्सल्याने त्या ऋषिकुमाराकडे पाहिले, “होय! मात्र ज्या सहज साध्या निष्कपट भावाने तू हा प्रश्न केलास, तसेच सर्व सांगावे एवढेच.”
परंतु तरीही त्या ऋषिकुमाराला अजून एक प्रश्न विचारायचाच होता. मात्र ह्यावेळेस त्याने रीतसर अनुज्ञा घेऊन प्रश्न विचारला, “हे ब्रह्मवादिनी लोपामुद्रे! तुम्हां सर्वांचे वात्सल्य पाहूनच मला प्रश्न विचारण्याचा धीर होत आहे.
माझ्या स्वतःमध्ये अजूनही अनेक दुर्गुण आहेत, अनेक प्रकारची भये व चिंता मला अधूनमधून सतावत असतात. मी अजूनही कामक्रोधादि षड्विकारांपासून मुक्त झालेलो नाही.
खरं तर मी आता ‘ऋषिकुमार` उरलेलो नाही, तर गुरुकुलांच्या व्यासनियमांनुसार मी ‘ऋषि` झालेलो आहे व त्यामुळेच मला शांभवीविद्येची उपासना करणे अत्यंत आवश्यकही वाटत आहे आणि करण्याची भीतीही वाटत आहे.
माझ्यातील हे तामसी तमोगुण नाहीसे करण्यासाठी मी शांभवीविद्येची उपासना करू शकेन काय?”
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने त्या ऋषिकुमाराला विचारले, “हे बालका! तू ज्या तळमळीने हा प्रश्न विचारतो आहेस, ती तळमळच शांभवीविद्येच्या दुसऱ्या पायरीवर अत्यंत आवश्यक असते
आणि हे लक्षात ठेवा की तुम्ही सर्वजणांनी पहिली पायरी आधीच पकडलेली आहे व म्हणूनच मी तुम्हाला पुढील पायऱ्या समजावून सांगू शकते.
हे सर्व उपस्थित श्रद्धावानहो! शिव-त्रिपुरासुर युद्धाची कथा हे शांभवीविद्येचेच कथास्वरूप आहे व त्या इतिहासाचा तुम्ही प्रत्येक जण एक घटक होतात.”
तिचे हे बोलणे ऐकताच तो ऋषिकुमार अत्यंत विनम्रपणे तिच्या चरणांवर मस्तक ठेवून मग उभा राहिला व त्यावेळेस त्याचा चेहरा सूर्याच्या सूर्योदयकिरणांच्या तेजाने झळकत होता.
त्याच्या चेहऱ्याकडे पाहून सर्व ऋषिकुमार व शिवगण आश्चर्य व्यक्त करू लागले व हे पाहून लोपामुद्रेने त्यास प्रश्न केला, “तुझ्या चेहऱ्यावर हे बालार्ककिरणांचे तेज पसरले आहे, त्याचे कारण तुला ठाऊक आहे काय?”
त्या ऋषिकुमाराने अत्यंत विनयाने ‘नाही` असे उत्तर दिले व त्याबरोबर ब्रह्मर्षि कश्यप उठून उभे राहिले, “हे ज्येष्ठ ब्रह्मवादिनी लोपामुद्रे! ह्या ऋषिकुमाराचे नाव ‘गौतम` असे आहे. त्याचे हे नामकरण मीच केले आहे. कारण ह्याचा स्वभाव मध्याह्नाच्या प्रखर सूर्याप्रमाणे आहे व ह्याने त्याच्या तपश्चर्याही तशाच प्रखरतेने केल्या आहेत.
परंतु हा स्वतःच्या बाबतीतही एवढा कर्तव्यकठोर आहे की हा स्वतःची अगदी लहानातली लहान चूकसुद्धा क्षमा करत नाही व त्याचे प्रायश्चित्त करीत राहतो व ‘सूर्यकिरण` विज्ञानाचा हा श्रेष्ठ शास्त्रज्ञ बनलेला आहे. त्याच्या ह्या प्रखर सत्यनिष्ठ, नीतिनिष्ठ व धर्मनिष्ठ स्वभावामुळेच मी त्याला ‘गौतम` (गौ=सूर्यकिरण) हे नाव दिले आहे.
हे प्रिय शिष्य गौतम! तुझी तळमळदेखील अशीच प्रखर आहे व म्हणून तुझ्या चेहऱ्यावर हे सूर्यतेज पसरले आहे.”
ऋषि गौतमाने भक्तमाता पार्वतीस अत्यंत विनयपूर्वक विचारले, “हे भक्तमाते सिद्धिदात्री! माझ्या स्वभावातील ही प्रखरता कधी बरे दूर होईल?”
पार्वतीने हसून उत्तर दिले, “ज्या वेळेस तुझ्यासमोर शिळेतून जिवंत स्त्री आकार घेईल तेव्हा.”