भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनकहे इतिहास के कुछ पहलू - भाग 20

भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनकहे इतिहास के कुछ पहलू - भाग 20

काशीबाई आणि सुंदरबाई ह्या दोघी जणी, दुल्हेरावला आपल्या मंडळींनी ताब्यात घेतल्या-घेतल्या, तेथील कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने आपापल्या घोड्यानिशी तेथून निसटल्या होत्या व रामदीन वाल्मिकीने दिलेल्या नकाशानुसार, जंगलातील एका अवघड वाटेने स्मिथच्या छावणीच्या दिशेने निघाल्या होत्या.

स्मिथच्या छावणीजवळ पोहोचण्याचा हा एकच मार्ग त्यांना लवकरात लवकर तेथे घेऊन जाऊ शकत होता. हा रस्ता काशीबाईने गावातील काही, पूर्वी शिकार करणार्‍या व त्या जंगलात वावर असणार्‍या वृद्धांकडून माहीत करून घेतला होता आणि तोसुद्धा त्या वृद्धांना, त्यांच्या शिकारीच्या शौर्यकथा त्यांच्याकडून ऐकण्यासाठी मोहाची दारू पाजून. हे दारू पाजण्याचे काम व त्यांना बोलते करण्याचे काम लालाभाऊ बक्षी करत असत व त्यांच्याआधी सरदार मंजुनाथ पहाडी करत असत.

ह्यामुळे सरदार मंजुनाथ पहाडी, लालाभाऊ बक्षी ह्या दोघांना लगेचच लक्षात आले होते की काशीबाई व सुंदरबाई कुठे गेल्या असाव्यात. परंतु ते दोघेही वरकरणी शांतच राहिले कारण काशीबाईने त्या दोघांपासून काहीच लपवून ठेवले नव्हते व त्यामुळे ह्या दोघांनाही नीट ठाऊक होते की स्मिथच्या छावणीवर मोठा जमाव घेऊन हल्ला करणे अशक्य आहे.

ब्रिगेडियर स्मिथ अत्यंत धूर्त व कावेबाज होता. त्याने त्याची छावणी, राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतर जवळच्या अशा भागात हलवली होती की तो खरोखरच खूप सुरक्षित राहू शकला असता. ही जागा म्हणजे चार डोंगरांच्या मधोमध असलेली एक छोटीशी दरी होती व त्याच्या छावणीच्या चारी बाजूंनी रात्रंदिवस पन्नास-पन्नास सैनिक गस्त घालीत असत. त्या प्रत्येक गस्त घालणार्‍या सैनिकाकडे रायफलही असे व त्यांच्या प्रमुखाकडे अर्थात कोतवालाकडे दुर्बीणही असे. रात्रीच्या वेळीसुद्धा कुणी डोंगर उतरून येऊ शकू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आलेली होती.

काशीबाईने ह्यामागील कारणे शोधून काढलेली होती व तीसुद्धा दुल्हेरावाच्या गावातील एक माणूस, जो रोज सकाळी स्मिथच्या छावणीवर विविध जीवनोपयोगी वस्तू घेऊन जात असे, त्याच्या पत्नीपासून. हा माणूस दुल्हेरावचा सगळ्यांत विश्वासू व जवळचा साथीदार होता व स्मिथने राणी लक्ष्मीबाईवर हल्ला केला, तेव्हा त्याच्याबरोबरच होता व ह्यानेच बादल अश्वाच्या पायात गोळ्या मारण्याची शक्कल स्मिथला सुचविली होती व त्यामुळे स्मिथला हा दुल्हेरावपेक्षाही जास्त जवळचा झालेला होता. 

गावातील स्त्रिया व वृद्धांशी गप्पा मारता-मारता काशीबाईला ही माहिती मिळाली होती की दुल्हेरावाने ह्या ‌‘शंभुराव‌’ला ह्याच कारणासाठी दूर केलेले आहे व शंभुराव आणि दुल्हेरावमध्ये एक अबोल स्पर्धा सुरू झालेली आहे.

काशीबाईने शंभुरावच्या पत्नीशी गप्पा मारून-मारून सर्व माहिती काढून घेतली होती.

ह्या दोघींच्या घोड्यांबरोबरच एक तिसरा घोडाही त्यांच्या मागोमाग चालत होता व त्या घोड्यावर, तोंड व हातपाय बांधून ठेवलेला शंभुराव होता. त्याचा बकरा स्मिथच्या समोरच कापायचा होता.

पौर्णिमेची रात्र ह्या दोन्ही कार्यांसाठी मुद्दामहूनच निवडली होती कारण रात्रीचा फायदाही मिळावा व पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्रप्रकाशामुळे ह्या शिक्षा सगळ्यांना दिसाव्यात म्हणून.

दिवसा करण्यात मात्र एक धोका होता की त्या-त्या स्थानावरून परत पळून जाणे जमू शकले नसते व अजून अधिक काही दिवस वाट पाहिली असती, तर कुणा ना कुणा फितुराने ह्या लोकांविषयी माहिती, कंपनी सरकारला पुरवलीच असती व ते होऊन चालणार नव्हते.

अगदी पहाट होण्याच्या अल्पकाळ आधीच ह्या दोघी स्मिथच्या छावणीला अगदी लागून असणार्‍या, किंबहुना छावणीचे जणू प्रवेशद्वारच असणार्‍या खिंडीत जाऊन पोहोचल्या. (खिंड म्हणजे दोन डोंगरांमधील अरुंद वाट) तेथे पोहोचताच काशीबाईने, शंभुरावाकडूनच हस्तगत केलेली दुर्बीण बाहेर काढली व गस्त घालणारे सैनिक, बरोबर त्या खिंडीच्या समोर येताच घोडे दौडवत व रायफली झाडत खिंड उतरण्यास सुरुवात केली.

दोघींचे नेम अचूक होते व जिद्द आणि सूडाची भावना अत्यंत तीव्र. त्या दोघींच्या उरात पेटलेली स्वातंत्र्ययुद्धाची ज्योत त्या दोघींना बळ देत होती व राणी लक्ष्मीबाईच्या शेवटच्या क्षणांची आठवण ह्या दोघींच्या मस्तकात व हृदयात असीम धैर्य व शौर्य उत्पन्न करीत होती.

खिंड उतरेपर्यंतच्या काळातच, गस्त घालणारे सर्वच्या सर्व 50 सैनिक यमसदनी धाडले गेले होते कारण त्या दोघींच्या पाठोपाठ आलेल्या सरदार मंजुनाथ पहाडी व लालाभाऊ बक्षींकडेही रायफली होत्याच.

त्या दोघांनी घोड्यांच्या टापांच्या खुणांचा माग काढत प्रवास केला होता व ऐन मोक्याच्या क्षणी तेथे येऊन पोहोचले होते.

ह्या चौघांनी मिळून स्मिथच्या छावणीवर थेट हल्ला चढविला. स्मिथचे सर्व सैनिक गाढ झोपेतून खडबडून जागे झाले होते. परंतु ते कपडे घालून व शस्त्र परजून तंबूबाहेर येण्याच्या आतच ह्या चौघांनी, स्मिथच्या तंबूच्या चारही रक्षकांना ठार करून, एका वेश्येबरोबर झोपलेल्या स्मिथला पायाला धरून फरफटत बाहेर आणले होते आणि त्याच्या डोळ्यांसमोरच शंभुरावची गर्दन उडवली.

सरदार मंजुनाथ पहाडींनी त्यांच्या पहाडी आवाजात स्मिथच्या सर्व सैनिकांना सूचना केली की ‌‘कुणीही काहीही धाडस केल्यास, आमचे आजूबाजूच्या डोंगरावर लपून बसलेले चारशे सैनिक तुम्हाला गोळ्या घालतील. आम्हाला फक्त ब्रिगेडियर स्मिथ हवा आहे. दुसर्‍या कुणालाही आम्ही काहीही हानी करणार नाही.‌’  

ह्यामुळे ते सर्व सैनिक गप्पच पाहिले. कुणीही काही हालचाल करण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

काशीबाईनेच ब्रिगेडियर स्मिथच्या तंगडीला दोर बांधलेला होता. स्मिथ सहाय्यासाठी ओरडत होता परंतु जराही न थांबता ते बाकीचे तिघे, त्यांच्या घोड्यांच्या टापांखाली स्मिथला अक्षरश: तुडवत होते.

प्रत्येक घोड्याच्या प्रत्येक लाथेबरोबर स्मिथची येणारी किंकाळी ह्या चौघांनाही अधिक बळ देत होती.

सरदार मंजुनाथ पहाडींनी ब्रिगेडियर स्मिथला भाल्यांनी टोचून-टोचून एका झाडाच्या आधाराने उभे केले.

काशीबाईनेसुद्धा घोड्यावरून उतरून स्वत:च्या हातांनी स्मिथला, तिच्याकडील दोराने त्या झाडाला घट्ट बांधून ठेवले.

तिच्या मागोमाग घोड्यावरून उतरलेल्या सुंदरबाईने स्मिथच्या दोन्ही पायांमध्ये प्रत्येकी चार-चार गोळ्या मारल्या व प्रत्येक गोळीबरोबर ती, ‌‘जय राणी लक्ष्मीबाई! जय बादल!‌’ असे मोठमोठ्याने ओरडत होती व ह्या तिघांनीही तिला साथ दिली होती.

सर्वांत शेवटी घोड्यावरून खाली उतरलेल्या लालाभाऊ बक्षींनी स्मिथच्या प्रत्येक हातामध्ये चार-चार गोळ्या घातल्या.

ह्या आपल्या लोकांना स्मिथला ठार मारायचेच नव्हते. त्याला सहज मरण द्यायचे नव्हते. त्याचे हाल-हाल होऊन मरणे, संपूर्ण ब्रिटीश सैन्याला व भारतीय फितुरांना कळणे आवश्यक होते.

त्यामुळे ते चारही जण परत घोड्यावर चढले व काशीबाईने त्याच्या पाठीवर तलवारीने एक खोलवर जखम केली, जशी राणी लक्ष्मीबाईच्या पाठीवर झाली होती तशी.

त्या चौघांनाही खूप शांत वाटत होते आणि त्या चौघांच्याही डोळ्यांसमोर सर्वत्र राणी लक्ष्मीबाई दिसत होती.

हे चौघे परत फिरणार, तेवढ्यात एका ब्रिटीश सैनिकाने ओरडून सांगितले, “मी खात्री करून घेतली आहे की आजूबाजूच्या डोंगरावर कुणीही नाही.”

आणि त्याबरोबर त्या सर्वच्या सर्व सैनिकांच्या रायफली एकाच वेळेस मारा करू लागल्या. हे चौघेही, सर्वांगात शिरलेल्या रायफलींच्या गोळ्यांमुळे कसेबसे परत जंगलात शिरले व नेटाने दौडत विरुद्ध दिशेने जाऊ लागले.
जवळजवळ एक तासानंतर त्यांची गाठ, त्यांचाच शोध घेत येणार्‍या आपल्या इतर लमाणांशी पडली आणि त्या सर्वांना ‌‘काय घडले‌’ ते सांगता-सांगताच त्या चौघांनीही एक-एक करून प्राण सोडले. स्मिथचे सैन्य ह्यांच्या मागे आलेच नव्हते. ते सर्व जण स्मिथला वाचवण्याच्या मागे लागले होते आणि त्यांना ह्यांच्या मागे लागायचेही नव्हते कारण हल्ल्याचा आदेश देणार्‍या त्या ब्रिटीश सैनिकाने स्पष्टपणे सर्वांना ह्यावेळेस सांगितले होते की ‌‘डोंगरावर सैनिक नाहीत असे मी निव्वळ धादांत खोटे बोललो आहे. आपण आपली व स्मिथची सुरक्षा पाहूया.‌’ 

आपले सर्व लमाण ह्या चौघांचेही मृतदेह घेऊन जंगलातीलच एका दुसर्‍या मार्गाने एका दुसर्‍याच दरीत शिरले, जेथे घनदाट झाडी होती.

त्या चौघांचे अंतिम संस्कार करताना कुणाच्याही डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. मोतीबाई व गंगाबाई ह्या दोघींनी त्या चौघांनाही अग्नी दिला. गीता म्हणायला ह्यावेळेस रामचंद्रराव नव्हता.
ह्यानंतर मोतीबाईने निर्णय घेतला व सर्व जण छोटे-छोटे गट करून तात्या टोपेंना भेटण्यासाठी निघाले व मोतीबाई एकटी, राणी लक्ष्मीबाई, मोरोपंत व हे चौघे ह्या सहाजणांच्या अस्थी घेऊन काशीला जाण्यास निघाली. 


(कथा चालू)